कोविड काळात कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत तातडीने द्या – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

मुंबई, दि.१० : कोविड काळात कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना ५० लाखांची मदत तातडीने देण्यात यावी, असे निर्देश वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिले. कोविडच्या काळात कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना मदती संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

राज्यमंत्री जयस्वाल यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत कोणतीही प्रशासकीय अडचण निर्माण होऊ नये, अशा  सूचना दिल्या. सर्व आवश्यक पुरावे उपलब्ध असतानाही प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत ईश्वर साठवणे, मल्लिका पठाण व वनमाला मदनकर यांनी निवेदने सादर केली.

या निर्णयामुळे मृतांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार असून शासनाकडून मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *