कोणत्याही योजनेत न सामावणाऱ्या रुग्णांच्या गुडघे प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र मिशन

नागपूर,दि. १३ : महाराष्ट्रातील 40 वयोवर्षांपेक्षा अधिक असलेल्या सूमारे 4 कोटी नागरिकांपैकी किमान 40 लाख नागरिक हे संधीवात, गुडघेदुखी आणि सांधेदुखी निगडीत समस्यांनी ग्रस्त आहेत. यापैकी सूमारे 10 लाख नागरिकांना सांधेबदल शस्त्रक्रियेची गरज आहे. या गरजु रुग्णांपैकी जे रुग्ण कोणत्याही योजनेत बसू शकत नाहीत अशा गरजवंत रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तत्काळ सहाय्य व उपचार मिळावेत यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण सामंजस्य करार मॉईल व आयजीएमसी यांच्यामध्ये करण्यात आला आहे.

नागपूर व भंडारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी खाणी आहेत अशा खाणींच्या लगत असलेल्या 10 किलोमीटर अंतरातील गरजवंत रुग्ण, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि ग्रामीण भागातील गरजवंत रुग्णांना  सांधेरोपण शस्त्रक्रिया तत्काळ विनामुल्य केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. या योजनातही जे सामावू शकत नाही अशा रुग्णांना आता सांधेरोपणासाठी या करारांतर्गत मोठी उपलब्धी मिळाली आहे. सद्यस्थितीत मॉईल अंतर्गत नागपूर जिल्ह्यात चार ठिकणी व भंडारा जिल्ह्यात दोन ठिकाणी खाणी आहेत. या खाणीच्या क्षेत्रात आदिवासी संख्या जास्त असल्याने याचा लाभ त्यांना होईल. आरोग्य विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मॉईल यांच्या विद्यमाने खाणी असलेल्या भागात पात्र गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *