कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. ११: भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे आयोजित कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२४- २०२५ या वर्षात निबंध स्पर्धेसाठी ‘विकसित भारत- सन २०४७’, उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध हा वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा, निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये, निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून); टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल, पत्ता नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षिस २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी), टोपणनाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल, पत्ता लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर ‘कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा, २०२४-२०२५’ असे नमूद करावे. आणि हा लिफाफा ‘मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला मंत्रालय, मादम कामा मार्ग, मुंबई- ४०००३२’ या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. स्पर्धकांच्या काही शंका असल्यास, माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: jsmrb-iipa@egov.in  द्वारे संपर्क साधावा.

०००

राजू धोत्रे/वि.सं.अ/

The post कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *