‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

मुंबई, दि. २७ :  ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘महिला बचत गट नोंदणी मोहीम व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान’ राबविण्याचा शासन निर्णय १७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केला आहे. सन २०२६ ते २०२९ या कालावधीत हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी दिली आहे.

बचत गटांसोबत वंचित महिलांना जोडण्यावर भर

या अभियानांतर्गत अद्याप कोणत्याही स्वयं सहाय्यता (बचत) गटाशी जोडल्या न गेलेल्या ग्रामीण महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे. विशेषतः हंगामी स्थलांतरित महिला, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार; तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील महिलांना ग्रामसखी आणि समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून प्राधान्याने बचत गटांशी जोडले जाणार आहे.

१ कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचे लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ६ कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचा संकल्प केला आहे. त्याला गती देत महाराष्ट्रातील १ कोटी ग्रामीण महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमेद’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्रीधर डुबे पाटील यांनी सांगितले.

जागृती मोहीम आणि क्षमता बांधणी कार्यशाळा

ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, जुलै ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम आणि क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. या माध्यमातून स्थानिक समुदाय संस्था आणि महिलांना अभियानाच्या विविध टप्प्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

शासकीय योजनांचा कृतिसंगम

या अभियानाद्वारे महिलांना केवळ बचत गटात सहभागी करून घेणे एवढ्यावर मर्यादित न राहता, विविध शासकीय योजनांचा कृतिसंगम (Convergence) साधून त्यांना कौशल्य विकास, वित्तीय सेवा तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे.

सविस्तर मार्गदर्शक सूचना

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई यांच्या स्तरावरून सविस्तर मार्गदर्शक सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात आत्मसन्मान, स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्याचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

महिलांना सहभागाचे आवाहन

ग्रामीण भागातील बचत गटात अद्याप सहभागी न झालेल्या सर्व पात्र महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने बचत गटांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी केले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *