टेंभू – म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचवण्यासाठी लवकरच बैठक – जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे -पाटील

कृष्णा नदीवरील प्रस्तावित बॅरेजची पाहणी

पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजनांवर भर

 

सांगली, दि. 25 : टेंभू- म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे पाणी लाभ क्षेत्रात पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

टेंभू व म्हैसाळ योजनेद्वारे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात कृष्णा नदीचे पाणी पोहोचवून शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु ज्या भागांमध्ये या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही, त्या भागात विस्तारित योजनेची कामे प्रगती पथावर आहेत. या योजनेचे पाणी सर्व लाभक्षेत्राला देण्यासाठी या कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. तसेच,सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वारणा व कृष्णा नदीच्या संगमाच्या खालील बाजूस प्रस्तावित द्वारयुक्त बंधाऱ्याच्या (बॅरेज) ठिकाणची पाहणी व म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 1 ला मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, उल्हास दादा पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता महादेव कदम, कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, सीमा मोहिते आणि अमोल गुरव तसेच संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्याधुनिक क्षमतेची पाणीउपसा यंत्रणा उभी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून उपसा सिंचन योजना, केटी वेअर बंधारे, सिंचनाच्या योजना निर्माण केल्या जात आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढत चालली असून विस्तृत भागाला पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उपाययोजना करण्याचा जलसंपदा विभागाच्या वतीने प्रयत्न केला जात असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

अलमट्टीमुळे कोल्हापूर व सांगलीत पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजनांवर भर

अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. पूर परिस्थितीवरील उपाययोजनांसाठीच्या अहवालावर अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.

 म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 ला भेट

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 ला भेट देऊन पाहणी केली. म्हैसाळ प्रकल्पातील सर्व टप्प्यातील सर्व पंप मागणीनुसार सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सध्या प्रगतीपथावर असलेली म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना ही मुख्यमंत्री वॉर रुम मध्ये असल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. यामुळे प्रकल्पातील भूसंपादन, वन विभाग तसेच इतर विभागांकडून जलद गतीने सहकार्य प्राप्त झाले आहे. या सर्वांमुळे मागील २ वर्षातच योजनेची शिर्षकामे ९५ टक्के पर्यंत पूर्ण झाली असून कालवा कामे ४६ टक्के पूर्ण झाली आहेत.

या भेटींदरम्यान जलसंपदा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी दिली.

बॅरेजमध्ये रुपांतर केल्यानंतर होणारे फायदे

प्राथमिक अभ्यासातून को. प. बंधारा सांगलीचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी मौजे हरिपूर येथील कृष्णा व वारणा नदीच्या संगमापुढील बाजूचे स्थान निश्चित केले आहे.

– यामुळे सांगली शहराच्या सिंचन व बिगर सिंचन गरजांसाठी सुमारे २० आठवड्यांचा पाणीसाठा उपलब्ध होईल.

सांगली को.प. बंधाऱ्याचे आधुनिक रेडियल गेटयुक्त बॅरेजमध्ये रुपांतरण केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन शाश्वती निर्माण होईल.

* औद्योगिक क्षेत्रांना वर्षभर विश्वासार्ह जलपुरवठा मिळेल.

* म्हैसाळ उपसा सिंचन योजनेस आवश्यक जलपातळी उपलब्ध राहील.

* उन्हाळ्यात कृष्णा नदीतील जलउपलब्धता वाढेल.

* आधुनिक गेट प्रणालीमुळे जलनियमन अधिक सुरक्षित, जलद व कार्यक्षम होईल.

* पूरकाळात नदीतील प्रवाह व्यवस्थापन सुधारून पाण्याचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *