उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.

आषाढी एकादशीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना, अरिहंत शाळेने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक अभिनव पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञानाधारित प्रकल्प ‘टेक वारी’ या नावाने सादर करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी एआय वापरून तयार केलेल्या उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनात आणि विशेषतः पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा करता येईल, यावरही चर्चा झाली.

स्वयंचलित वर्ग, खोल्या स्मार्ट हजेरी, ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा वगैरे प्रकल्पांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना हे प्रकल्प ग्रामीण भागातील शाळांमध्ये कसे राबवता येतील या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि प्रकल्पात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *