पुणे, दि. १०: आषाढी वारी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते. गुरुवारी विठ्ठल नाम आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले.
०००