मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘डिजिटल गव्हर्नन्स इन अ चेंजिंग वर्ल्ड’ विषयावर व्याख्यान

मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘टेक-वारी 2.0′ अंतर्गत ‘डिजिटल गव्हर्नन्स इन अ चेंजिंग वर्ल्ड’ या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्याख्यात्यांनी त्यांच्या क्षेत्रात एआय वापरून कामात केलेल्या सुधारणांबद्दल माहिती दिली.

तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे शासनव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधने आणि मानवी संवेदनशीलता यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

‘टेक-वारी 2.0′ या उपक्रमांतर्गत ‘डिजिटल गव्हर्नन्स इन अ चेंजिंग वर्ल्ड’ या विषयावर मंत्रालयातील परिषद सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मानवाच्या उत्क्रांतीचा आढावा घेत त्यांनी तंत्रज्ञानाच्या पुढील प्रवासाची दिशा स्पष्ट केली. भविष्यात ‘मशीन इन मॅन’, ‘मॅन इन मशीन’ आणि ‘मॅन-मशीन एकत्रीकरण’ या संकल्पनांमुळे कार्यपद्धतीत मोठे बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले. डिजिटल साधनांचा वापर अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देतानाच, मानवी मूल्ये आणि संवेदनशीलता जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.

यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, सीबीसीचे अध्यक्षा राधा चव्हाण, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डॉ. विवेक राघवन आदींनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 


००००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *