पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे. पाणंद रस्त्यांची कामे हाती घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. यासाठी नियमित बैठका घेऊन कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. शेतकऱ्यांच्या दळणवळणाची सुविधा सुलभ होण्यासाठी तसेच शेतीमालाच्या वाहतुकीला गती मिळण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कामांमध्ये कोणतीही ढिलाई न ठेवता गुणवत्ता आणि वेळेचे भान राखून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेत व पाणंद रस्ते कामांचे नियोजन, पूर्वतयारी, अंमलबजावणीतील अडचणी तसेच निधी उपलब्धतेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित यंत्रणांना पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *