जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्व-गणना’ प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : भारत सरकारच्या जनगणना २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना  प्रक्रियेत राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

जनगणना दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणना करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यातील कामकाज १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज सुरू होण्यापूर्वी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांसाठी स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने या जनगणनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात येणार असून नागरिकांना https://se.census.gov.in या पोर्टलद्वारे स्व-गणना करता येणार आहे. यामुळे माहिती संकलनाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेची अचूकता वाढण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे जेणेकरून केंद्र शासनाच्या अन्य उपक्रमाप्रमाणेच डिजिटल इंडिया उपक्रमामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील यासाठी शासनाच्या सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *