आरामनगर रहिवाशांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. १७ : वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील आरामनगर येथील स्थानिक रहिवाशांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित समस्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आरामनगरवासीयांच्या समस्या गांभीर्याने विचारात घेत, त्यावर तातडीने व कायमस्वरूपी योग्य तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

आरामनगर परिसरातील पायाभूत सुविधा, पुनर्विकास आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणींविषयी रहिवाशांच्या गेल्या काही काळापासून तक्रारी होत्या. रहिवाशांच्या याच तक्रारींची दखल घेत विशेष आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस माजी आमदार भारती लव्हेकर, मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी बोरीकर, गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव विद्या हम्पया यांच्यासह संबंधित विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान माजी आमदार भारती लव्हेकर आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी आरामनगरमधील वस्तुस्थिती व रहिवाशांच्या मागण्या मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करत राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी स्थानिक रहिवाशांचे हित केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कोणतीही टाळाटाळ न करता कायदेशीर चौकट आणि नियमांच्या अधीन राहून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असणारे प्रस्ताव आणि मंजुरीच्या प्रक्रियेला गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरामनगर रहिवाशांच्या समस्या सोडवण्यास गती द्यावी, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी यावेळी दिले.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *