अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,  दि. 24 : राज्यातील खाणपट्ट्यांमधून होणारी अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनिकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात कोकण महसूल विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, महासंचालक डॉ. जी. डी. कांबळे, उपसंचालक रोशन मेश्राम व कोकण विभागातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी उपस्थित होते.

खनिजाची वाहतूक करताना खनिजे झाकलेली नसल्याने धूळ उडून प्रदूषण होते. शिवाय अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून खाणीचे परवाने तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश श्री.देसाई यांनी यावेळी दिले. खाणींमधून खनिज तसेच गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी जेणेकरुन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे नियंत्रण जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर ठेवावे. या होणाऱ्या चोऱ्या रोखता येतील. तसेच राज्यभरातील खनिकर्म विभागाची यंत्रणा सर्वंकष दृष्टिकोनातून अद्ययावत करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

कोकण महसूल विभागात लिलावासाठी ज्या संस्थांनी खाणी उत्खननासाठी घेतल्या आहेत. त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा संबंधित संस्थेचा उत्खननाचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *