अतिवृष्टीने क्षतिग्रस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

मुंबई, दि. ३०: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बरेचश्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे क्षतिग्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर होणे आवश्यक असल्याने यासाठीचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास त्वरित सादर करावा, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्री विखे-पाटील यांनी मंत्रालयात राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आणि इतर प्रकल्पाचे झालेले नुकसानीबाबतचा आढावा घेतला.

बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे.  काही बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूस तर काही बंधाऱ्यांच्या एका बाजूचे नुकसान झाले असून काही बंधाऱ्यांच्या गेटचेही नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानाची तातडीने पाहणी करावी. हे बंधारे तातडीने दुरुस्त करून पाणी अडविणे आवश्यक असल्याने याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *