मुंबईतील एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन अदा करण्यासाठी राज्य शासन सक्रीय भूमिका घेणार –कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई, दि. २८ : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबतचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. तथापि राज्य शासन या प्रकरणात सक्रिय भूमिका घेईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबईतील एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबत विधानसभा सदस्य ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांवर अन्याय होऊ नये, त्यांच्या थकीत वेतनासह सर्व देणी वेळेत मिळावीत यासाठी केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने कार्य करीत आहे. आवश्यकतेनुसार मंत्रालयात बैठक घेऊन अशा सर्व प्रकरणांवर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
केंद्र शासनाच्या कामगार विभागाचे उप मुख्य आयुक्त यांच्या स्तरावर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मॅनेजमेंट यांच्यात तडजोडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सुनावण्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्या माध्यमातून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी यावेळी नमूद केले.
या चर्चेत सदस्य संजय केळकर, दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.
000
मोहिनी राणे/विसंअ
गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई, दि. २८ : गिग कामगारांसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता 2020 पारित करून त्याची अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू केली आहे. या संहितेत प्रथमच गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार आहे, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील गिग कामगारांसाठी नोंदणी, विमा आणि सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याबाबत विधानसभेत सदस्य हेमंत ओगले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून कामगारांना जीवन आणि अपंगत्व विमा, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धापकाळ संरक्षण, शिक्षण सहाय्य व इतर लाभ देण्यात येतील. राज्य स्तरावरही असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे.
या चर्चेत विधानसभा सदस्य राहुल पाटील, अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.
0000
मोहिनी राणे/विसंअ
वरसाळे ते वाणापाडा रस्त्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार –मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. २८ – पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वरसाळे ते वाणापाडा हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत मंजूर असून, त्याचा कार्यारंभ आदेश 12 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आला आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे काम सुरू असून मार्चपर्यंत काम पूर्ण होईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वरसाळे ते वाणापाडा या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, रस्त्याच्या मंजूर लांबीप्रमाणे काम होत आहे. सध्या रस्त्याचे खडीकरण सुरू असून अंतिम थराचे कामही सुरू आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे तपासणीनंतरच पूर्णत्वास नेली जातात. तपासणी झाल्याशिवाय ठेकेदाराला देयक मिळत नाही. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. काम निधीअभावी थांबलेले नसून रस्त्याचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील. संबंधित ठेकेदार व प्राधिकरणांना सूचना देऊन हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य शेखर निकम, हरीश पिंपळे यांनी सहभाग घेतला.
00000
मोहिनी राणे/विसंअ