मुंबई, दि. २५: हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.
या बैठकीत राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आणि भात व सोयाबीनचे तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
कृषी मंत्री भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, उपलब्ध आकडेवारीवर तत्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती कोणताही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीत कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, उपसचिव प्रतिभा पाटील व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
संध्या गरवारे/विसंअ