स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता

मुंबई, दि. ११: भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे तसेच राज्यपाल यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/ विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजण्यापूर्वी किंवा ९.३५ वाजल्यानंतर आयोजित करावा, अशा सूचना राजशिष्टाचार विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय/ जिल्हा/ उप विभागीय/ तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. काही मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येत आहे. यानुसार त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल.

याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालय वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/ देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी/ विद्यार्थीनीचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा Webinar आयोजित करावा, देशभक्तीपर मोहीम राबविण्यात यावी, तसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबडी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि दिनांक ११ मार्च, १९९८ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी, राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/ पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. विभागीय आयुक्त, कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मंत्रालय, मुंबई येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *