पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि. १ मार्च (जिमाका) :- पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे. तर पोलिस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी, त्यासाठी शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना आज येथे आश्वासित केले.

येथील साकेत मैदान येथे आयोजित 35 व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमाखदार समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

समारोप सोहळ्याची सुरुवात विविध पोलिस खेळाडू पथकांच्या संचलनाने झाली. यावेळी महिला आणि पुरुष गटातील १०० मीटर धावण्याच्या अंतिम स्पर्धाही पार पडल्या. विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, या स्पर्धांमध्ये राज्यभरातील 2 हजार 929 पोलिस खेळाडूंनी सहभाग घेतला, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा क्रीडा स्पर्धांमुळे पोलिस दलातील संघभावना अधिक बळकट होते. यापुढेही जास्तीत जास्त पोलिस खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. महिला खेळाडूंची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि कर्तव्य व क्रीडा या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

ते म्हणाले, पोलिस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आपली प्रतिभा दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ऑलिम्पिकसह सर्वोच्च स्तरावर आपले पोलिस खेळाडू स्पर्धा करू शकतील, यासाठी शासन सर्व प्रकारचे आवश्यक ते सहकार्य नक्कीच करेल. यानुषंगाने 2036 च्या ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीमध्ये पोलिस संघांना समाविष्ट करण्यासाठी “मिशन ऑलिम्पिक” सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वोत्तम पोलिस दल म्हणून ओळखले जाते आणि त्याचा नावलौकिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून मदत करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा करुन राज्य पोलिसांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिकता आणि कामगिरीचा “मानदंड” प्रस्थापित केला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

महाराष्ट्र पोलिस दलाचा सन्मान आणि कर्तव्यदक्षता अधिक दृढ करण्याचा हा उत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांचा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या दिमाखदार सोहळयाचे उत्साहपूर्ण असे सूत्रसंचलन सचिन देवडे व श्वेता हुल्ले यांनी केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *