नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. ३० : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.  दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन निश्चित भव्य असे होईल. हे संमेलन देश नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांकरीता अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने त्याला विशेष महत्व आहे. असून यासाठी महाराष्ट्र शासन पाठीशी असल्याचे, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मराठी साहित्यिक उत्साही असून हे संमेलन विचारप्रवर्तक ठरेल असे सांगून या साहित्य संमेलनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीतील मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी दिल्लीतील विविध मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्लीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या मराठी लोकांनी मुख्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून दिल्लीतील मराठी मंडळांसाठी आणि येथील वास्तुंसाठी निश्चित योग्य ती पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

000000

 

The post नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *