श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे, दि. २६: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माउलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीचे आणि सर्वांगीण विकासाचे साकडे घातले.

दर्शनानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विश्वस्तांनी श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासंदर्भातील विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकासकामे तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने त्यांना सादर करण्यात आले.

निवेदनातील मागण्या आणि विविध विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शन बारी चा विषय मागील १२  वर्षांपासून प्रलंबित आहे तो लवकर मार्गी लावण्याबाबत ग्वाही दिली.

याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे तसेच आजी-माजी पदाधिकारी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *