“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. ३० : दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी, अशा घरगुती सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिले. ते पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट दिली असता बोलत होते.

“चालक-वाहक हा एसटीचा कणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून तो दररोज राज्यातील सुमारे ५० ते ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील,” असा मोलाचा सल्ला मंत्री सरनाईक यांनी दिला.

बसस्थानकाची पाहणी करताना त्यांनी अनेक वर्षे बंद असलेले व्यापारी गाळे महिला बचत गटांना व होतकरू उद्योजक तरुणांना अत्यल्प भाड्यात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढेल तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असे त्यांनी नमूद केले.

महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली.

या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *