विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १० : राज्यातील आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, गडकिल्ल्यांचे संवर्धन, त्याचप्रमाणे औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकास पथावर नेण्याचे कार्य या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार आहे, असे मत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद, बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 4300 कोटीचा बांबू लागवड प्रकल्प, कृषी विकासाला चालना देणारे आहेत. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातील 5818 गावांमध्ये हाती घेण्यात आलेली 427 कोटी रुपये किमतीची एक लाख 48 हजार 888 कामे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण राज्य सरकार आखत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात याचा 50 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून येत्या दोन वर्षात यासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *