राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी राज्यपालांचा संवाद

मुंबई, दि. २१ : राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा संचालकांशी संवाद साधला. आज खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ व क्रीड़ा प्रकारांना पोषक वातावरण तयार करुन देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

समर्थ व शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी खेळ हा महत्वाचा घटक आहे. खरे शिक्षण बंद वर्गखोलीच्या बाहेर होते असे सांगून खेळांमधील सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, खिलाडू वृत्ती, संवाद, सहनशक्ती व कठोर परिश्रम करण्याची भावना विकसित होते असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्राकडे क्रीडा विकासाची मोठी ताकत आहे. राज्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत. पूर्वी क्रीडाप्रकारांना ‘अभ्यासेतर उपक्रम’ समजले जायचे परंतु आज खेळ व क्रीडा ‘सहअभ्यासक्रम’ झाला आहे असे सांगून विद्यापीठांनी खेळांमध्ये ग्रामीण व आदिवासी युवकांना देखील सहभागी होण्यास प्रेरित करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

विकसित भारत निर्माण करण्यात खेळांची भूमिका देखील महत्वाची आहे असे सांगून विद्यापीठांनी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर ‘स्पोर्ट्स इकोसिस्टिम’ तयार करावी असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे व मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी सादरीकरण केले.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *