मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. 26 :- ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, संताजी-धनाजी, राजर्षी शाहू महाराज, रामचंद्र पंत अमात्य ते क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजांवर आधारित इतिहास लेखन केले. मराठेशाहीतील इतिहासावरील गैरसमज दूर करून वास्तववादी इतिहास समाजासमोर मांडण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.

त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *