मुंबई, दि. २० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आमदार प्रकाश सोळंके, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मीनल करणवाल तसेच उपसचिव कचरे उपस्थित होते.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शासनाच्या अटींनुसार फार्मर आयडीमधील आवश्यक दुरुस्त्या करून शेतकऱ्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. तुषार सिंचन संचासाठी ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर द्यावा. तसेच रेशीम योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी रेशीम विभागासमवेत समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
कृषी मंत्री भरणे यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभ आणि जलद पद्धतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले.
००००
संध्या गरवारे/विसंअ