नसरापूर प्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

मुंबई, दि.२: नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत  दुदैवी आणि संतापजनक आहे. या  घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे.  या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी  दिली आहे.

बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *