मुंबई, दि. २७ : ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी ते सातत्याने चालणारे लोकशिक्षणाचे आणि सार्वजनिक हिताचे अभियान आहे. या जनचळवळीत समाजातील सर्व घटकांनी आणि विशेषतः विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
30 जुलै रोजी वरळी डोम येथे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ होत असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल (ऑनलाइन) यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, बृहन्मुंबईतील विविध यंत्रणांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि जिल्हाधिकारी कटियार यांनी संबंधित यंत्रणांना या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि आयोजनासाठी काटेकोर सूचना दिल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
नशामुक्त मुंबई अभियान हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून नशामुक्त मुंबई करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. वरळी डोम येथील मुख्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन करावे. यामध्ये प्रामुख्याने सातवीच्या पुढील शालेय तसेच महाविद्यालयांच्या आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सहभागी करुन घ्यावे. या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना या मोहिमेत सामावून घेतले जावे. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांमधून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
00000
बी.सी.झंवर/विसंअ