धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 4: एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे   पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल त्या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच जिल्ह्यातील धरणांमधील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला  जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह सर्व प्रांत व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या गावासाठी किंवा वाडी वस्त्यांसाठी टँकरची मागणी आल्यास तात्काळ संबंधित गावाला भेट देऊन टँकर सुरु करावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे हात पंप बंद पडले आहे त्या तातडीने दुरुस्त करावे. ज्या ठिकाणी विधंन विहिरीची गरज आहे अशा ठिकाणी नव्याने विधंन विहिरी घ्याव्यात तसेच दुरुस्तीचे कामे हाती घ्यावेत. टंचाई काळात शेतकऱ्यांचे देयकाअभावी विज कनेक्शन तोडू नये. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल या पद्धतीने पाणी साठवून ठेवावे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्तक राहून कामे करावीत.ज्या ठिकाणी  विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *