जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित; शेतकऱ्यांना त्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

बुलढाणा दि. ११ (जिमाका): शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात आला आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण १ लाख १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८५ हजार ४५३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केले आहे, तर अद्याप ३० हजार ०६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे.

राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. चालू हंगामात पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी आवश्यक नियोजन पूर्ण केले असून, शेतकऱ्यांनी बँकेत अनावश्यक गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते त्वरित पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी केले आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *