जत तालुक्यातील २९ गावांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २९ : जत तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत सविस्तर आढावा बैठक झाली.

बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच जत तालुक्यातील संबंधित अधिकारी, सरपंच, प्रतिनिधी उपस्थित होते.

पाटबंधारे विभागाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. १५ लघुपाटबंधारे तलावांची कामे प्रगतीपथावर आहेत. २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या योजनेमुळे प्रत्येक गावाला स्वतंत्र व स्थिर जलपुरवठा उपलब्ध होईल आणि नागरिकांवरील पाणी बिलाचा भारही कमी होईल.

आमदार  गोपीचंद पडळकर आणि सरपंच प्रतिनिधींनी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने  घेतल्या जाणाऱ्या या निर्णयाबद्दल सर्वांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक साहाय्य देण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी सांगितले.

०००००

राजू धोत्रे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *