छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद व्यक्त

मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरली आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार असून, हे राज्यासाठी मोठं यश आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी गेल्या वर्षी पाठविण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, आपल्या स्वराज्याचे साक्षीदार असलेले हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत प्रतीकं आहेत. त्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होणं, हे महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.

या ऐतिहासिक निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. मुख्यमंत्री असताना आपण स्वतः या किल्ल्यांच्या नामांकनासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

राज्य शासन हे या सर्व गड-किल्ल्यांच्या जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या ऐतिहासिक घडामोडीबद्दल त्यांनी सर्व शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन केलं आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *