कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १९ : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रस्तावित कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक पार पडली. कृष्णा उपखोऱ्यातील पुराचे पाणी भीमा उपखोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरनियंत्रणासोबतच दुष्काळी भागांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व असाधारण असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामांचाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, प्रशासकीय मान्यता आणि पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केल्या.

बैठकीस ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते तसेच संबंधित विभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते. पूर नियंत्रण आणि जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने या बैठकीत बैठक महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *