भयमुक्त,कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरीता पुढाकार घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई, दि. १०: राज्यातील दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच परीक्षा ह्या कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात या संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्याची संकल्पना आहे.
शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा, असे आवाहन करतानाच विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पुर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
०००
The post आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे first appeared on महासंवाद.