संगीत तणावमुक्त जीवनासाठी अत्यंत प्रभावी माध्यम – गायिका, लेखिका प्रा. डॉ. मृदुला दाढे

मुंबई, दि. ५ : आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव हा न मागता मिळणारा घटक बनला आहे. या तणावातून मुक्त होण्यासाठी संगीत हा परमेश्वराने दिलेला सुंदर उपाय असून, सूर आणि लयीच्या माध्यमातून मन एकाग्र होऊन ध्यानावस्था प्राप्त होते. संगीत हे तणावमुक्त जीवनासाठी अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे गायिका, लेखिका व मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मृदुला दाढे यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘नादरंग – म्युझिक फॉर स्ट्रेस फ्री लाइफ’ या विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. मृदुला दाढे बोलत होत्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, अपर मुख्य सचिव राधिका रस्तोगी, इतर विभागाचे सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘नाद-आराधना’ या संकल्पनेतून निवडक मराठी आणि हिंदी गीतांचा आस्वाद देताना गाण्यांमागील सौंदर्यही डॉ. मृदुला दाढे यांनी सांगितले. निसर्ग, सूर आणि शब्द यांचा संगम श्रोत्यांच्या भावविश्वाला स्पर्श करतो. कठीण परिस्थितीत संगीताची साथ घेऊन त्यामधील सूर आपणाला नक्कीच सकारात्मक दिशा देतील. तसेच संगीताच्या माध्यमातून मानसिक शांतता मिळवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात भक्तीगीताने करण्यात आली. यावेळी गायक निलेश निरगुडकर यांनी डॉ. मृदुला दाढे यांना गायनात साथ दिली. तर की-बोर्ड वादन प्रशांत लळीत, तबला वादन ऋषीराज साळवी, हर्षद काळभाटे, इतर तालवाद व्यंकटेश कुलकर्णी यांनी साथ दिली.

कार्यक्रमाचे आभार उपसचिव लीना संखे यांनी मानले.

 

 

 

 

‘टेक-वारी 2.0’ मध्ये व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

 

००००

गजानन पाटील/स.सं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *