मुंबई, दि. 13 : भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांचेसह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.
राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील प्रतिनिधींना आपण लोकभवन येथे निमंत्रित करुन त्यांच्या समस्या जाणून घेऊ असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी शिष्टमंडळाने भटक्या विमुक्त समाजाच्या शिक्षण, आरोग्य, शासकीय नोंदीसंबंधी कागदपत्रे आदी प्रश्नांवर चर्चा केली. परिषदेच्या सदस्यांनी राज्यपालांना यमगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील एकलव्य विद्या संकुल येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच दिनांक 31 ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त जातीचा दाखल, आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर व राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
00000