बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई, दि. १२ : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा मार्ग अवलंबिला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील एकूण ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादित केले असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारत उल्लेखनीय यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच बालगृहांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मार्गदर्शन आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. बालगृहातील या मुलांचे ऑनलाईन सेशन घेण्यात आले, तसेच त्यांचा सराव घेण्यात आला. शिक्षकांचे विशेष वर्ग या दहावीच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यानंतर मुंबई उपनगर येथील बालगृहातील ८८, अहिल्यानगर येथील ८०, तर बीड येथील ४७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ठाणे जिल्ह्यात ४२, सोलापूर येथे ३९, तर कोल्हापूर येथे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उच्च गुणांची नोंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने ९५.२० टक्के गुण मिळवले असून द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ८६ टक्के गुण मिळाले. तसेच बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी ९४ टक्के, तर द्वितीय क्रमांकासाठी ९२.४० टक्के गुणांची नोंद झाली आहे. पुणे, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनीही ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी गुणवत्तापूर्ण निकाल लागल्याचे दिसून आले. नंदुरबार, लातूर, नाशिक आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *