पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पोलीस विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व ‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’ पुस्तकाचे अनावरण कार्यक्रम आज हिरे भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, एखादी घटना घडल्यानंतर माहिती देण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक भूमिका बजावण्याची क्षमता पोलीस पाटलांकडे आहे. समाजात पोलीस पाटलांकडे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. अलीकडच्या काळात सुशिक्षित महिला व पुरुष, पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नागरिक पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाला योग्य दिशा व स्पष्टता मिळावी मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल. ब्रिटिशकालीन कायदे लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे कायदे रद्द करून भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम लागू करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे ऐतिहासिक कायदे अस्तित्वात आले असून, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. गावातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, सतर्क राहणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी.

आमदार श्री. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांबरोबरच पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

आमदार श्री. अग्रवाल म्हणाले की, ग्रामीण भागात पोलीस पाटील व्यवस्था प्रभावी आहे. पोलीस पाटील हे पोलीस विभागाचे स्लिपरसेल म्हणून काम करतात. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक श्री. धिवरे म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमध्ये दैनंदिन कामकाजास उपयुक्त सूचना, अधिनियम व शासकीय सूचना व अधिनियमाचा समावेश असून, या पुस्तिकेमुळे पोलीस पाटलांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची  जाणीव होईल.

यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत तत्काळ माहिती पोलीस दलाला पुरविणाऱ्या पोलीस पाटलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.तसेच पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी केले, तर अपर पोलीस अधीक्षक डॉ. देवरे यांनी आभार मानले. मेळाव्यास जिल्हाभरातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *