जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना अत्यंत गंभीर; दोषींची गय नाही – मंत्री डॉ. अशोक वुईके

गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी स्पष्ट केले.

जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत डॉ. वुईके म्हणाले, “अनुदानित आश्रमशाळेत अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून एखादी संस्था आश्रमशाळा चालवत असेल, तर अशा निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली जाईल. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडले जाणार नाही.”

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे ही संबंधित संस्था व व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या घटनेत कोणत्या स्तरावर त्रुटी अथवा दुर्लक्ष झाले, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आश्रमशाळांमध्ये निवासी परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची नियमित देखरेख तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणा आणि आश्रमशाळा व्यवस्थापनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे निर्देशही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

0000

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *