भक्तीच्या महासागरात प्रदर्शन, चित्ररथ व कलापथकांच्या माध्यमातून जनतेशी ‘संवाद वारी; माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अभिनव जनजागृती उपक्रम

पुणे, दि. १४: आषाढी वारीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा ‘संवाद वारी’ हा उपक्रम वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. माहितीपूर्ण प्रदर्शन, विकासाची माहिती देणारा चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या कलापथकांच्या कार्यक्रमांद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भक्तीच्या वातावरणात विकासाची माहिती देणारा हा उपक्रम शासन आणि जनतेतील संवाद अधिक प्रभावी करण्याचे काम करीत आहे.

‘संवाद वारी’अंतर्गत उभारण्यात आलेल्या माहिती प्रदर्शनामध्ये राज्य शासनाच्या विविध विकासकामांचा आणि योजनांचा आकर्षक छायाचित्रे, माहितीपूर्ण आलेख व सुबक मांडणीच्या माध्यमातून परिचय करून दिला जात आहे. पायाभूत सुविधा, शेती, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, डिजिटल सेवा तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने गर्दी करत असून अनेकजण योजनांविषयी अधिक माहिती जाणून घेत आहेत.

‘संवाद वारी’चा विशेष आकर्षण ठरलेला माहितीपर चित्ररथ वारी मार्गावर वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक दृश्यरचना, माहितीपर फलक, ध्वनिक्षेपकाद्वारे दिले जाणारे संदेश आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती यामुळे हा चित्ररथ चालते-बोलते माहिती केंद्र बनला आहे. वारीच्या प्रवासादरम्यान हजारो वारकरी चित्ररथाजवळ थांबून विविध योजनांची माहिती घेत आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कलापथकांमार्फत भारूड, पोवाडे, शाहिरी, लोकगीते, नाटिका आणि गीतांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती मनोरंजनासह प्रभावीपणे सादर केली जात आहे. लोककलेच्या माध्यमातून दिला जाणारा हा संदेश वारकऱ्यांपर्यंत सहज पोहोचत असून कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजनातून प्रबोधन ही संतपरंपरा या उपक्रमातून अधिक प्रभावीपणे पुढे नेली जात आहे.

वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ‘संवाद वारी’ची ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या योजनांविषयी अचूक माहिती उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

भक्ती, लोकसंस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या ‘संवाद वारी’च्या माध्यमातून माहितीचे लोकशक्तीत रूपांतर करण्याचा आणि शासनाच्या विकासाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत आहे.

दि. १५ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती येथे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. या दोन्ही ठिकाणी ‘संवाद वारी’ अंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ आणि कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रदर्शनातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती भाविक व वारकऱ्यांना दिली जाणार असून, चित्ररथ आणि कलापथकाच्या सादरीकरणातून ही माहिती अधिक प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *