बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी ‘महा-संकल्प’ नेतृत्व संवाद

मुंबई, दि. १०: राष्ट्रीय ध्येय ‘विकसित भारत @२०४७’ च्या दिशेने वाटचाल करताना बालकांचे सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) आणि चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा-संकल्प’ या उच्चस्तरीय नेतृत्व संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ मार्च २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC), बीकेसी, मुंबई येथे होणार आहे.

डिजिटल युगात मुलांसमोर निर्माण होणारे विविध धोके आणि आव्हाने लक्षात घेता मुलांच्या जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा आणि सहभागाचा अधिकार सुरक्षित ठेवणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, तसेच गृहराज्य मंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृहराज्य मंत्री (शहर) योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या नेतृत्व संवादात आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, सायबर क्राईम विभाग, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामांकित शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व सहभागी होणार आहे. बालकांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर या मंचावर सखोल चर्चा होणार असून, भविष्यातील प्रभावी धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात मुले इंटरनेट आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असताना त्यातून होणारे मानसिक व शारीरिक शोषण ही एक अदृश्य पण अत्यंत गंभीर समस्या बनत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, नागरी समाज आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांनी एकत्र येऊन या विषयावर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *