१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेड दि. १९ :- नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ हा भव्य कार्यक्रम येत्या २४ आणि २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

सूक्ष्म नियोजन आणि विविध समित्या

कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी  विविध समित्या स्थापन केल्या आहेत. यात बुटांच्या व्यवस्थेपासून ते भोजनापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी ८ ठिकाणी अखंड ‘लंगर’ (महाप्रसाद) सुरू राहतील. तसेच, त्यांच्या निवासाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. यासोबतच शासकीय योजनांचे आणि विविध उद्योजकांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील.

या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही नांदेडमध्ये येतील. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कडेकोट तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग या कार्यक्रमासाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहत आहे.

हा कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नाही. यात लबाना, बंजारा,सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल आदींसह आणि इतर सर्व समुदायांचे लोक मोठ्याप्रमाणात सहभागी होत आहेत.

जनतेचे योगदान महत्त्वाचे

आजच्या धावपळीच्या जगात ‘त्याग आणि सेवा’ हीच खरी माणुसकी आहे. हा विचार जपण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जनतेसह देशभरातील जनतेने या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ज्यांना या महायज्ञात सेवा (स्वयंसेवक म्हणून) द्यायची आहे, त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *