नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस हरपला! – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार 

मुंबई, दि. २८ : “महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात जिंदादिल, मनमिळाऊ आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे गंगाराम गवाणकर आता आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने नाट्यविश्वातील एक अनोखा, उत्साही आणि संवेदनशील कलाकार हरपला आहे,” अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

“गंगाराम गवाणकर यांच्या व्यक्तिमत्त्वातला प्रामाणिकपणा, मिश्किलपणा, विनयशीलता आणि त्यांची अफाट सर्जनशीलता यामुळे त्यांच्या लेखणीला जे यश आणि लोकमान्यता मिळाली, त्या उंचीपर्यंत पोहोचणे कोणासाठीही कठीण आहे,” असे शेलार म्हणाले.

त्यांची नाटके ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’, ‘वन रुम किचन’ प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांच्या लेखनात उमेदीच्या काळातील संघर्ष, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचा सुंदर संगम दिसतो. “त्यांच्या नाटकांची कल्पकता आणि व्यापकता इतकी वेगळी आहे की, त्यावर विश्लेषण आणि व्याख्यानेही होऊ शकतात,” असेही शेलार यांनी नमूद केले.

000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *