जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक – युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. यात चंद्रपूर जिल्हाही मागे नाही. शासन आणि प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असले तरी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

सुरवातीला शहिदांचे स्मरण करून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आधुनिक कालखंडाच्या इतिहासात 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्रलढ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. आदिवासींच्या जमिनीवर इंग्रजांनी जबरदस्तीने कब्जा केल्यानंतर शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध युध्द पुकारले. 1942 च्या चिमूर क्रांतीमुळे चंद्रपूर हे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नावारुपास आले.

आपल्याला हे स्वातंत्र शहिदांच्या बलिदानातनू मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शासन- प्रशासन कटिबद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहादरम्यान 73 महाराजस्व अभियान शिबिरांतर्गत 5 हजार 392 विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतक-यांची संख्या 3 लक्ष 2 हजार 882 असून ही टक्केवारी 97.89 आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ अंतर्गत आदिम जमातींच्या नागरिकांकरिता 482 घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात एकूण 83 शिबिर आयोजित करण्यात आले. यात विविध प्रकारचे 15 हजार 853 दाखले देण्यात आले. आदिवासी भगिनींच्या सक्षमीकरणासाठी आणि सन्मानासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ राबविण्याचा धोरणात्‍मक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 49 कोटी 70 लक्ष रकमेचा 20 वा हप्ता जिल्ह्यातील 2 लक्ष 48 हजार 540 शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जिल्हयातील सर्व 824 ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 232 गावांची निवड करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 561 गावांची निवड झाली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा एकूण 1372 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. रमाई आवास शहरी व ग्रामीण योजनेचे एकूण 847 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

शासनाने 6 ऑगस्ट, 2025 पासून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानात’ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवावा. तसेच दुस-यांना जीवनदान देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान व नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते ‘नशामुक्त अभियान’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी तंबाखु सेवन प्रतिबंधबाबत शपथ घेण्यात आली.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मान

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी वैक्कमा भिमनपाल्लीवार, वीरनारी अरुणा रामटेके, पार्वती डाहुले, छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, नायब सुभेदार शंकर मेंगरे यांच्यासह डॉ. संदीप पिपरे, डॉ. भास्कर सोनारकर, आर.आर. आबा सुंदरग्राम योजनेंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत वांद्रा (ता. ब्रम्हपुरी), कळमना (राजुरा) यांचा तसेच अवयवदान केलेल्या नागरिकांचे नातेवाईक ज्ञानेश्वर बोबडे, माधुरी भटवलकर, भारती नवघरे, महादेव जंपलवार, प्रतिक पारखी, नंदू हेमणे, एकांश कोटगले यांचा मान्यवरांनी शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *