इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच सुमारे २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *